सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी-गणपती सणासाठी शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्यात येत आहे. यामध्ये हरभरा डाळ, रवा, साखर, खाद्यतेल प्रत्येकी एक किलोचा समावेश आहे. याचे वितरण 6 सप्टेंबरपासून करण्यात येणार असून, याचा जिल्ह्यातील चार लाख कुटुंबांना लाभ मिळणार आहे. एकूण लाभार्थीच्या तुलनेत 92 टक्केच कीट येत असल्यामुळे याबाबत रेशन दुकानदार संघटनेने प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
गौरी-गणपतीच्या सणासाठी शासनाकडून सांगली जिल्ह्यासाठी 3 लाख 96 हजार 290 इतके आनंदाचा शिधा संच मंजूर करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे पुरवठादार कंपनीकडून त्या त्या तालुक्याच्या गोदामामध्ये ते पाठवण्यात आले आहेत. यामध्ये दुकानदारांना सहा रुपये कमिशन देण्यात येणार आहे. एकूण लाभार्थ्यांपैकी 92 टक्के लाभार्थीनाच शिधा येत असल्यामुळे ग्राहकांना याचे वितरण करताना समस्या निर्माण होत असल्याची तक्रार रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक उपाध्ये यांनी सांगितले की, रेशन व्यवस्था चालवत असताना फार काठावर राहून काम करावे लागत आहे. आनंदाचा शिधा गणपतीसाठी 92 टक्के आला आहे. आठ टक्के राहिलेल्यांना तो कसा वाटप करायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. दुकानदार इतकी वर्षे काम करूनही शासन आमच्यावर विश्वास ठेवत नाही, हे आमचे दुर्दैव आहे. शासनाने शंभर टक्के वितरण करून सर्वांनाच दिलासा दिला पाहिजे.
तालुकानिहाय लाभार्थीची संख्या...
सांगली : 52079, मिरज: 44983, कवठेमहांकाळ : 23088, जत: 49946, आटपाडी: 22391, कडेगाव: 24747, खानापूर-विटा 26831, तासगाव: 40130, पलूस : 26860, वाळवा : 59961, शिराळा : 25294, एकूण 3,96,290.
आनंदाचा शिधा जवळपास सर्व तालुक्यांच्या गोदामामध्ये पोहोच करण्यात आला आहे. दुकानदारांना याचे वितरण सुरू असून, प्रत्यक्षात 6 सप्टेंबरपासून ग्राहकांना हा शिधा मिळेल.
टिप्पणी पोस्ट करा