Health Insurance Claim: विमा खरेदी करताना, कंपन्या त्यांच्या ग्राहकांना मोठमोठी आश्वासने देतात, परंतु जेव्हा ग्राहकांकडून दावे केले जातात तेव्हा बहुतेक प्रकरणांमध्ये त्यांचे दावे कंपन्यांकडून नाकारले जातात. कोरोना नंतर देशात आरोग्य विम्याची मागणी झपाट्याने वाढत आहे, परंतु त्याचप्रमाणे कंपनीकडून दावा नाकारणे किंवा पैसे देण्यास नकार देण्याच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.
एका सर्वेक्षणातून असे समोर आले आहे की, गेल्या तीन वर्षांत सुमारे 43 टक्के आरोग्य विमा पॉलिसीधारकांना त्यांचे दावे निकाली काढण्यात अडचणी आल्या आहेत. 'लोकल सर्कल' सर्वेक्षणातून हा निष्कर्ष समोर आला आहे.
देशभरातील 302 जिल्ह्यांतील 39,000 हून अधिक लोकांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की पॉलिसीधारकांना दावे नाकारणे, पेमेंट आणि त्यांच्या सेटलमेंटसाठी बराच वेळ लागणे यासारख्या आव्हानांचा सामना ग्राहकांना करावा लागला आहे.
'लोकल सर्कल' या सर्वेक्षण संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातील 93 टक्के लोकांनी यात बदल केले पाहिजेत असा सल्ला दिला आहे. विमा कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर तपशीलवार दावे आणि पॉलिसी रद्द करण्याचा डेटा दर महिन्याला उघड करणे अनिवार्य करण्याची मागणी देखील ग्राहकांनी केली आहे.
Local Circlesच्या अहवालानुसार, 'भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) काही हस्तक्षेप करूनही, ग्राहकांना त्यांचे दावे प्राप्त करण्यासाठी विमा कंपन्यांशी संघर्ष करावा लागत आहे.''
त्यात विमा कंपनीकडून आरोग्य विम्याचे दावे नाकारणे आणि पॉलिसी रद्द करणे यासारख्या समस्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अनेक वेळा विमा कंपन्या दाव्यात केलेल्या संपूर्ण रकमेऐवजी काही अंशी रक्कम मंजूर करतात.
सर्वेक्षण अहवालानुसार, आरोग्य विमा दाव्यांची प्रक्रिया न्याय्य आणि जलद केली जावी आणि पॉलिसीधारकाला त्रास होऊ नये यासाठी IRDAI, आरोग्य मंत्रालय तसेच ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सहकार्य करावे अशी लोकांची इच्छा आहे.
टिप्पणी पोस्ट करा