Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते त्यामुळे राज्य सरकारने घोषणांचा धडाका लावला आहे. मागील महिन्यात ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा चौथा हप्ता दिल्यानंतर लगेचच पाचव्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी २२५४ कोटी ९६ लाख रुपयांच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा झाल्यानंतर प्रशासन वेगाने कामाला लागले आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या, गृहजिल्ह्यात ठाण मांडलेले अधिकारी यांच्या याद्या करण्याचे काम सुरू असून, मंगळवारी किंवा बुधवारी बदल्या होण्याची शक्यता आहे.
तसेच जर राज्यातील निवडणुका एका टप्प्यात झाल्या तर १२ किंवा १३ ऑक्टोबर रोजी निवडणुकांची शक्यता आहे. तर दोन टप्प्यातील निवडणूक असल्यास ७ ऑक्टोबरच्या आत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने पाचवा हप्ता वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेतील पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा हप्ता वाटप केला आहे. मात्र या हप्त्यामध्ये काही शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण आणि अन्य बाबी न झाल्याने ई-केवायसी पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे त्यातील काही शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाल्याने त्यांनाही हप्ता जमा करण्यात येणार आहे.
ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीतील पाचव्या हप्त्यासाठी २०१२ कोटी रुपयांच्या निधीची गरज असून, उर्वरित ३०२ कोटींची रक्कम मागील हप्त्यातील प्रलंबित शेतकऱ्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे. चौथ्या हप्त्यातील ३९ हेजार ७२९ शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हप्ते जमा करण्यात येणार आहेत. तसेच एक ते चार हप्त्यांमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना ८४ कोटी ५८ लाख रुपये जमा करण्यात येणार आहेत.
टिप्पणी पोस्ट करा